हा काळही सरेल!
पुन्हा एकदा इक्विटी मार्केट मधे मोठी पडझड आणि एकामागून एक जागतिक तसेच देशांतर्गत वाईट बातम्यांची रीघ सुरु झाली आहे आणि पुन्हा एकदा सामान्य गुंतवणूकदारांमधे गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. 'पुन्हा एकदा' म्हणण्याचं कारण म्हणजे २०१८च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अशीच जोराची पडझड झाली होती आणि निरनिराळ्या वाईट बातम्यांचं पेव फुटलं होतं. तेव्हा 'झी मराठी दिशा' मधे मी 'धीर धरी रे' या लेखात सामान्य गुंतवणूकदारांसाठी संयम आणि चिकाटीचं महत्त्व सोदाहरण विशद केलं होतं. जेव्हा सर्व काही आलबेल असते तेव्हा बरेच लोक हे विसरून जातात की शेअर बाजारात मुदत ठेवींप्रमाणे स्थिर दराने परतावा मिळणार नसतो, तर अनेक महिने – काही वेळा वर्षे – गुंतवणूक नुकसानीत दिसत राहू शकते. मात्र चांगले दिवस आले की थोड्याच अवधीत अशी गुंतवणूक नुकसानच भरून काढते असे नव्हे तर वर नफाही करून देते.
या विषयी बहुसंख्य गुंतवणूकदारांची वर्तणूक गंमतीची गोष्ट असते. जेव्हा मार्केट वर वर चाललेले असते, निर्देशांक नियमितपणे नवीन नवीन उच्चान्क गाठत असतो तेव्हा उगवलेला सूर्य कधी बुडणारच नाही अशा आत्मविश्वासात ते असतात. मात्र जेव्हा परिस्थिती पालटते आणि मार्केट पडू लागतं तेव्हा ते इतके पराकोटीचे निराश होऊन जातात की जणू 'इस रात की सुबह नहीं'! अर्थातच ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येणारच असते, आणि रात्री नंतर पुन्हा पहाट होणारच असते, त्याचप्रमाणे गुंतवणूक विश्वात देखील चांगला आणि वाईट काळ आलटूनपालटून पुनःपुन्हा येत राहणार असतात. त्यामुळे आपल्याला शेअर बाजारातील पडझडीकडे एखादी समस्या म्हणून नव्हे तर त्याचा आंतरिक भाग, एक स्वभावविशेष म्हणून बघायला शिकलं पाहिजे.
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवतेय. एक पराक्रमी आणि वैभवशाली राजा असतो. एकदा लहरीच्या भरात तो राज्यात दवंडी पिटवतो की 'आनंदी माणूस दुःखी होईल आणि दुःखी माणूस आनंदी होईल' असा मंत्र जो कोणी सांगेल त्याला मोठे ईनाम देण्यात येईल. तेव्हा एक हुशार माणूस त्याला एक मोठ्ठा आरसा भेट देतो, त्यावर लिहिलेले असते 'हा काळही सरेल' -- अतीव दुःखाने व्याकुळ झालेल्या माणसाला आशेचा किरण दाखवणारा आणि आनंदात मश्गुल झालेल्याला वास्तवात आणणारा हाच तो मंत्र! रोज रोज मार्केट चढउतार बघून खुश किंवा चिंतीत होणाऱ्या सर्व सामान्य गुंतवणूकदारांनी हा मंत्र लिहून घरात दिसेल असा लावला पाहिजे.
'गुंतवणूक' हे मानवी मनातील भविष्याविषयी वाटणाऱ्या आशा आणि अनिश्चितता या दोन भावनांमधील द्वंद्व आहे. इक्विटीमधील दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे माणसाची प्रगती आणि औद्योजिकता यांवर गुंतवणूकदाराने दाखवलेला अढळ विश्वासच होय. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक म्हणजे आपण मोठमोठ्या कंपन्या उभारणारे उद्योजक व प्रवर्तक हे दीर्घ काळात कितीही अडचणी आल्या तरी आपापले उद्योगधंदे यशस्वीरित्या चालवतील, वाढवतील आणि आपल्याला भरघोस परतावा मिळवून देतील या गोष्टीवरील विश्वास होय.
जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पडझड होते तेव्हा तेव्हा आपला हा विश्वास नक्की किती अढळ आहे याची तपासणी होत असते. यात मीडिया मधून काही तज्ज्ञ लोक जपान मध्ये कशी गेली २० वर्षे मंदी सुरु आहे, युरोपातील रोख्यांवरील व्याजदर कमी होत होत आता कसे शून्याखाली घसरले आहेत, अमेरिकेतील रोखे बाजारात कशी मंदीची चाहूल लागली आहे, भारतात कसा आर्थिक वृद्धिदर कमी होतोय, बांधकाम तसेच वाहन उद्योगात कशी प्रचंड मंदी आहे, बँकांमध्ये तसेच इतर फायनान्स कंपन्यांमध्ये कसे मोठ्या प्रमाणावर बुडीत कर्जे जमली आहेत वगैरे गोष्टींचं चर्वितचर्वण करत असतात. हे सगळे आपल्या विश्वासाला दणके देण्याचं काम करतात. अर्थात, आपण कितीही अंदाज वर्तवायचा प्रयत्न केला तरी भविष्यात नक्की काय होणार आहे ते कोणालाच माहित नसतं.
या माहित नसलेल्या भविष्याविषयी आपण आशावादी आहोत की निराशावादी यावर आपण अशा कठीण प्रसंगी कसे वागू ते ठरत असते. निराशावादी (किंवा अज्ञानी) गुंतवणूकदार आताची पडझड ही भविष्यात अनंत काळ सुरु राहणाऱ्या महामंदीची नांदी समजून मार्केट मधून पलायन करतील. तर आशावादी गुंतवणूकदार 'वो सुबह कभी तो आयेगी' म्हणत संयम ठेवू शकतील, किंबहुना खाली आलेल्या आकर्षक किमतींवर जास्तीची गुंतवणूक करू शकतील.
या लेखाच्या प्रत्येक वाचकाला मी हे आवर्जून सांगेन की नजीकच्या भविष्यातील भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी नक्कीच आपण सर्वांनी आशावादी असावं अशी परिस्थिती आहे. याचे कारण म्हणजे भारतातील प्रचंड मोठी युवा पिढी. जगातील सर्वात मोठा इंग्रजी येणारा सुशिक्षित व कुशल मनुष्यबळाचा साठा भारतात आहे. भारतात पायाभूत सुविधांमधे होत असलेली गुंतवणूक तसेच वाढत्या उत्पन्नासोबत जनतेच्या वाढत्या गरजा यातून दमदार विकासदर साध्य होण्याची अपेक्षा आहे. तसेच येत्या काही वर्षात भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न $२०००ची पातळी ओलांडेल. ही पातळी ओलांडणाऱ्या देशांची त्या पुढील काळातील आर्थिक प्रगती जलद गतीने होते असा अनुभव आहे.
त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील पडझड, बेअर मार्केट किंवा मंदीच्या गप्पा अशा घटना नेहेमीच तात्कालिक ठरतील, आणि गुंतवणूकदारांना खरेदी करायची संधी देत राहतील. जोपर्यंत आपल्या मनात हा विश्वास पक्का ठसत नाही, तो पर्यंत बाजारातील पडझडीच्या सत्रात आपल्याला नेहेमीच मानसिक अस्वस्थतेचा सामना करत राहावा लागेल.
अर्थात या सगळ्याचा अर्थ असा नाही की सद्य परिस्थिती चिंताजनक नाहीये. हे नक्कीच खरंय की जागतिक आर्थिक परिस्थिती नक्कीच काळजी वाटावी अशी आहे. अमेरिका-चीन या दोन महासत्तांमधील व्यापारयुद्ध अधिक चिघळले तर संपूर्ण जग मंदीत लोटले जाण्याची भीती आहे. त्याचा भारतावरही परिणाम होणे अटळ आहे. मात्र अशा सगळ्या संकटांचा सामना करूनही कालांतराने भारतीय कंपन्या, उद्योजक सावरतील आणि त्यांच्या वाढत्या नफ्यामुळे शेअर मार्केट देखील वर जाईल. वर म्हटल्याप्रमाणे या सर्व सव्यापसव्यात नक्की किती काळ निघून जाईल ते सांगणे कठीण आहे. पण त्यामुळे आपल्याला इक्विटी गुंतवणुकीतून घाबरून, खचून किंवा कंटाळून पळून जायचे नाहीये. काही झालं तरी शेवटी म्हणतातच ना 'डर के आगे जीत हैं!'
---- प्राजक्ता कशेळकर